गोव्यात SCO परराष्ट्र मंत्र्यांची महत्वपूर्ण बैठक; गरीबी आणि दहशतवाद महत्वपूर्ण मुद्दे, वाचा सविस्तर

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्यूरो रिपोर्ट : गोव्यात सुरू असलेल्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भारताने दहशतवादाच्या मुद्द्यावर जोरदार हल्ला केला, त्यानंतर हे प्रकरण थेट पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्यापर्यंत गेले. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी एकत्रितपणे दहशतवादाचा नाश करण्याचे आवाहन सभेला केले, परंतु त्याचवेळी आपण राजनैतिक फायद्यासाठी दहशतवादाला शस्त्र बनविण्याच्या फंदात पडू नये, असेही सांगितले.
यापूर्वी भारतीय परराष्ट्रमंत्र्यांनी एससीओच्या व्यासपीठावर दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला होता. जयशंकर म्हणाले होते की, दहशतवादाला कोणत्याही परिस्थितीत समर्थन दिले जाऊ शकत नाही. सर्व प्रकारातील दहशतवाद संपवला पाहिजे. दहशतवादाची आर्थिक रसद रोखण्यासाठीही प्रभावी कारवाई आवश्यक आहे. भारतीय परराष्ट्रमंत्र्यांनी एससीओच्या प्रमुख ठरावांची आठवण करून दिली आणि दहशतवादाविरुद्धची लढाई मुख्य असल्याचे सांगितले.

भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनंतर बिलावल भुट्टो यांनाही बोलण्याची संधी देण्यात आली. यावेळी बिलावल म्हणाले की, परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत माझे आगमन हे दर्शवते की पाकिस्तान एससीओला किती महत्त्व देतो. पाकिस्तान मूळ शांघाय स्पिरिटमध्ये अंतर्भूत असलेल्या परस्पर विश्वास आणि समान विकासाच्या तत्त्वांचे पूर्णपणे पालन करतो, असेही ते म्हणाले.
युरेशियन कनेक्टिव्हिटीला पुढील स्तरावर नेण्यासाठी SCO हे एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरू शकते, असे पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले. तसेच हवामान संकटाशी लढण्यासाठी सामूहिक कृती करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की हवामान संकट मानवतेच्या अस्तित्वासाठी संभाव्य धोका आहे.

गरिबी निर्मूलनावरही भाष्य
बिलावल यांनी SCO अंतर्गत दारिद्र्य निर्मूलनासाठी विशेष कार्य गट स्थापन करण्याचे आवाहन केले आणि ते त्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरेल असे सांगितले. येथे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की पाकिस्तान सध्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे आणि कोठूनही मदतीची अपेक्षा करत आहे.
ते म्हणाले की “SCO हे रचनात्मक आणि परस्पर फायदेशीर सहकार्याद्वारे परस्पर समंजसपणा, सुरक्षा आणि विकासाला चालना देण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून उदयास आले आहे. पाकिस्तान बहुपक्षीयतेसाठी वचनबद्ध आहे आणि सर्व आंतरराष्ट्रीय मंचांवर आघाडीची भूमिका बजावत आहे.”
दुरूनच नमस्ते !
SCO समिट दरम्यान भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्याशी हस्तांदोलन केले नाही. एस जयशंकर शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या बैठकीदरम्यान सदस्य देशांच्या सर्व परराष्ट्र मंत्र्यांचे व्यासपीठावर स्वागत करत होते. यादरम्यान सभेत सहभागी होण्यासाठी आलेले पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो स्टेजवर पोहोचले तेव्हा हस्तांदोलन करण्याऐवजी जयशंकर यांनी दुरूनच त्यांचे स्वागत केले. याला प्रत्युत्तर म्हणून बिलावल भुट्टो यांनाही नमस्ते म्हणावे लागले. फोटो सेशननंतर भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भुट्टो यांना स्टेजच्या पलीकडे जाण्याचा इशारा केला.

बैठकीपूर्वी, भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी SCO च्या मंचावरून संबोधित केले, ज्यामध्ये दहशतवादाचा मुद्दा ठळकपणे मांडण्यात आला. जयशंकर म्हणाले, दहशतवादाला कोणत्याही परिस्थितीत समर्थन देता येणार नाही. सर्व प्रकारातील दहशतवाद संपवला पाहिजे. दहशतवादाची आर्थिक रसद रोखण्यासाठीही प्रभावी कारवाई आवश्यक आहे. हे लक्षात घेतले पाहिजे की दहशतवादाशी लढा हा SCO च्या प्रमुख ठरावांपैकी एक आहे.