कंगनाला रावण बनवलं! उद्धव ठाकरे म्हणतात…

सिध्देश सावंत | प्रतिनिधी
ब्युरो : सत्तेत आल्यानंतरचा पहिल्याच दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना संबोधित केलं. विजयादशमीला प्रतिकात्मक रावणाचं दहन करतात. रावण दहातोंडाचा असतो. तर काही जण दहातोंडांनी बोलतात, असा टोला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लगावलाय.
कोण आहे नमकहराम?
रावणाचं एक तोंड म्हणतं की मुंबई ही पाकव्याप्त काश्मीर आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी तोफ डागली. अभिनेत्री कंगानचं नाव न घेता तिच्यावर त्यांनी अप्रत्यक्षपणे टीका केलीये. ज्यांना घरी खायला मिळत नाही, अशी माणसं मुंबईत येतात. मुंबईचं नमक खातात. आणि याच मुंबईवर बोलताना नमकहरामी करतात, अशा शब्दांत त्यांनी कंगनावर टीका केली,
‘इतकंच नाही, तर पाकव्याप्त काश्मीर मोदी भारतात आणू, असं म्हणाले होते’, याचीही त्यांनी आठवण करुन दिली. 370 कलम उठवल्यानंतर आता या रावणांना एक इंचतरी जागा काश्मीरात घेता येते का, हे तपासून पाहावं, असंही ओपन चॅलेंज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं. एवढ्यावरच ते थांबले नाहीत. तर मुंबईत येऊन अनधिकृत बांधकामं करणार असाल तर तुम्हाला अद्दल घडवू असाही टोला त्यांनी लगावला.
कोल्डवॉर
मधल्या काळात कंगना आणि शिवसेनेमध्ये कोल्डवॉर रंगलं होतं. कंगनाच्या मुंबईवरील वक्तव्यानंतर शिवसेनेही आक्रमक झाली होती. त्यानंतर बीएमसीने कंगनाच्या अनधिकृत ऑफिसवर कारवाई केली होती. या सगळ्या घडामोडींनंतर शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांनी अप्रत्यक्षरित्या कंगनाला सुनावलंय.