सुट्टीवर निघालेले,पण वाटेतच काळानं गाठलं…

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी
ब्युरोः अपघातांचं सत्र काही थांबायचं नाव घेत नाही. आज सकाळी बेळगावातील धारवाडमध्ये अपघात झालाय. हा अपघात एवढा भीषण होता की मिनी बसचा चक्काचूर झाला. समोरून येणाऱ्या ट्रकने मिनी बसला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. या अपघातात १३ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय.
कुठे झाला अपघात?
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर धारवाड शहरापासून ८ कि.मी. अंतरावर असलेल्या इटिग्ट्टी क्रॉसजवळ हा भीषण अपघात घडला. दावणगिरीहुन काही पर्यटक गोव्याला मिनी बसने जात होते. पहाटे धारवाड महामार्गावर मिनीबस आणि ट्रकची जोरदार धडक झाली.
मृतांमध्ये महिलांची संख्या जास्त
अपघातातील मृतामध्ये १० महिला असल्याचं समजलंय. तसंच टेम्पो चालकाचाही जागीच मृत्यू झालाय. हाती आलेल्या माहितीनुसार, जखमींमध्ये काहींची स्थिती चिंताजनक आहे. त्यांच्यावर धारवाड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर काही काळ हायवे वरील वाहतूक रेंगाळली होती. मात्र पोलिसांनी काही तासांतच ती नियंत्रणात आणली. मृतक दावणगेरे येथील रहिवासी असून ते फिरण्यासाठी गोव्याला जात होते. कोरोनामुळे मागील १० महिन्यांपासून फिरायला मिळाले नव्हते यामुळे गोवा फिरण्यास १७ महिला निघाल्या होत्या. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचं समजलंय. अपघातानंतर बायपास महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.
पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींनी ट्वीट करून व्यक्त केलं दुःख
कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यात रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलंय. “कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यात झालेल्या रस्ते अपघातातील प्राणहानीबद्दल आपल्याला तीव्र दुःख झालं आहे. या दुःखद प्रसंगी मृतांच्या कुटुंबीयांप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. अपघातात जखमी झालेल्यांना लवकर बरं वाटावं यासाठी मी प्रार्थना करतो,” असे पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हटलंय आहे.
Saddened by the loss of lives due to a road accident in Karnataka’s Dharwad district. In this sad hour, my thoughts are with the bereaved families. I pray for a quick recovery of those injured: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) January 15, 2021