‘गरीबांचं शोषण मित्रांचं पोषण, हेच आहे मोदीजींचं शासन’

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

नवी दिल्ली : मोदी सरकारनं महत्त्वाच्या कामगार कायद्यात दुरुस्त्या करण्यासंदर्भात संसदेत विधेयक मांडलं होतं. हे विधेयक मंजूर करण्यात आलं असून, तब्बल 17 वर्षांनी कामगार कायद्यांमध्ये व्यापक बदल करण्यात आले असून 40 हून अधिक कामगार कायद्यांना या चार संहितांमध्ये सामावून घेण्यात आले आहे. केंद्र सरकारनं कामगार कायद्यात दुरुस्ती केल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर टीका केली आहे. व्यावसायिक सुरक्षा, औद्योगिक संबंध आणि सामाजिक सुरक्षा अशा या तीन संहिता असून वेतन संहितेला यापूर्वीच मंजुरी देण्यात आली आहे. नव्या धोरणांमुळे कंपन्यांना कामगारांची भरती वा कपात, कामाचे तास, कामगारांचा संप, कामगारांचा नोकरीचा कार्यकाळ अशा कळीच्या मुद्यावर लवचीकता दाखवता येणार आहे. मात्र या संहितांमुळे कामगार संघटनांचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सरकारनं केलेल्या दुरूस्तीसंदर्भात राहुल गांधी यांनी ट्विट करून टीका केली आहे. “शेतकऱ्यांनंतर कामगारांवर वार. गरीबांचं शोषण, मित्रांचं पोषण, हेच आहे मोदीजींचं शासन,” या शब्दात राहुल गांधी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.