राहुल गांधींना उत्तर प्रदेश पोलिसांकडून अटक

Goan Varta Live | प्रतिनिधी
लखनौ : उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात असताना काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली. कलम 188 अंतर्गत पोलिसांकडून अटकेची कारवाई करण्यात आली. काँग्रेसकडून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे.
उत्तर प्रदेशामधील हाथरस येथील युवतीवर झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) आणि खासदार राहुल गांधी पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी हाथरसला रवाना झाले होते. मात्र पायी चालत जाणाऱ्या गांधीना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. पोलिसांनी राहुल गांधींच्या गळ्याला हात घातला. तसेच त्यांच्या सोबत असलेल्या ताफ्यावर लाठीमार केला. राहुल गांधी व त्यांच्या सोबत असल्यल्यांना आधी एक्स्प्रेस हायवेवर अडविण्यात आले. त्यानंतर ते पायीच रवाना झाले होते.
राहुल गांधी यांना यमुना एक्सप्रेस वेवर उत्तर प्रदेश पोलिसांकडून धक्काबुक्की झाली हे अतिशय निंदाजनक आहे. या घटनेचा मी जाहीर निषेध करते. कुठल्याही राज्याचं प्रशासन असू दे बलात्कारासारखी लाजिरवाणी घटना घडल्यावर प्रशासनाने फास्टट्रॅक पद्धतीने ॲक्शन घेतली पाहिजे. ती व्हावी या मागणीसाठी संसद सदस्य असलेले राहुल गांधी पीडितेच्या कुटुंबाला भेटायला जात होते. त्या ठिकाणी युपी सरकारकडून दडपशाही होणार असेल तर त्याचा मी जाहीर निषेध करते. पोलिसांनी न्याय्य मागणीसाठी जाणाऱ्या लोकप्रतिनिधी वा कुठल्याही व्यक्तीची कॉलर धरणं कितपत योग्य आहे, याचा न्याय मी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडे मागते आहे.
– खासदार सुप्रिया सुळे