काबूल विमानतळावर तालिबान्यांकडून 150 हून अधिक नागरिकांचं अपहरण

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो रिपोर्ट: अफगाणिस्तानातून सध्या एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. काबूल विमानतळावरुन सध्या तब्बल 150 हून अधिक नागरिकांचं अपहरण करण्यात आलं आहे. याशिवाय अपहरण झालेल्या नागरिकांमध्ये भारतीय नागरिकांचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं यासंदर्भात माहिती दिली आहे. पण यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
हेही वाचाः ब्रह्मेशानंदाचार्यांची अयोध्या श्रीराम जन्मभूमीला भेट
तालिबान्यांनी 150 हून अधिक नागरिकांचं अपहरण केलं
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिबान्यांनी 150 हून अधिक नागरिकांचं अपहरण केलं असून यामध्ये सर्वाधिक भारतीयांचा समावेश आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. तसंच तालिबान्यांनी दावा केला आहे की, सर्वच्या सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं आहे. तसंच मिळालेल्या माहितीनुसार, तालिबान्यांनी सांगितलं आहे की, या नागरिकांचं अपहरण केलेलं नाही, हे सर्व नागरिक सुरक्षित आहेत.
सर्व लोकांना काबूल विमानतळाच्या आतमध्ये नेण्यात आलं असल्याचा तालिबान्यांचा दावा
मीडिया रिपोर्ट्सनुसार, तालिबान्यांच्या वतीनं दावा करण्यात आला आहे की, सर्व लोकांना काबूल विमानतळाच्या आतमध्ये नेण्यात आलं आहे. तालिबान्यांनी म्हटलं आहे की, सर्व नागरिकांना दुसऱ्या गेटनं विमानतळाच्या आतमध्ये नेण्यात आलं आहे. सुत्रांच्या हावाल्यानं असं सांगितलं जात आहे की, ज्या लोकांना तालिबान्यांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांना नक्की कुठे नेण्यात आलं आहे. याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. दरम्यान, तालिबान्यांनी मात्र नागरिकांचं अपहरण करण्यात आल्याचं वृत्त फेटाळलं आहे. तालिबान्यांचे प्रवक्ता अहमदुल्ला वासिक यांनी 150 हून अधिक नागरिकांच्या अपहरणाचं वृत्त फेटाळून लावलं आहे.
हेही वाचाः हिमालयाची उंची, समुद्राची खोली यांचा समन्वय राखून कार्य करणार
अफगाणिस्तानवर 20 वर्षांपूर्वीची भीतीची परिस्थिती पुन्हा
दरम्यान, अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी सत्ता मिळवल्यानंतर तेथील परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. 20 वर्षांपूर्वीची भीतीची परिस्थिती पुन्हा तिथं दिसू लागली आहे. तालिबान्यांच्या दहशतीमुळे अनेकांवर देश सोडून जाण्याची वेळ आली आहे. दरम्यान, अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांना आपल्या देशात आणण्याचे मिशन सुरु आहे. सूत्रांचं म्हणणे आहे की, 15 ऑगस्टपूर्वीच ऑपरेशन एअरलिफ्टची तयारी सुरु झाली होती. 15 ऑगस्ट रोजी काबूलमधील भारतीय दूतावासापासून सुमारे 70 मीटर अंतरावर स्फोटाचा आवाज ऐकू आला, त्यानंतर अफगाणिस्तानातील भारतीयांच्या सुरक्षेविषयीची चिंता वाढली होती.