आजीसोबत गावी जाताना देवगडमधील 8 वर्षांच्या मुलावर काळाचा घाला

Goan Varta Live | प्रतिनिधी
रत्नागिरी : कशेडी घाटात झालेल्या खासगी बसच्या अपघातात देवगडमधील एका मुलावर काळानं घाला घातला. या अपघातात ८ वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झालाय. या मुलाच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. देवगड फणसगाव येथील ८ वर्षांच्या साहिल राजेंद्र राणे या मुलाचा बस अपघातात मृत्यू झालाय. तो आपल्या आजीसोबत कासार्डे देऊळवाडी इथं येत होता. मात्र या भीषण अपघातात त्याचा मृत्यू झाला.

मुंबई नायगाव येथून त्याचे आई- वडील घटनास्थळी दाखल झालेत. राणे कुटुंबीयांवर साहिलच्या जाण्यानं दुःखाचा डोंगर कोसळलाय. संध्याकाळी फणसगाव इथ त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती पोलिस पाटील वैजयंती नर यांनी दिलीय.

कशेडी घाटात बस तब्बल ५० फूट खोल दरीत कोसळून पहाटे हा अपघात झाला. बसमधील सगळे प्रवासी साखऱ झोपेच असताना हा अपघात झाला. चिंतामणी नावाची ही खासगी बस मुंबई येथून कणकवलीच्या दिशेने जात असतानाच हा अपघात झाला. बसमध्ये एकूण २७ प्रवासी होते. यापैकी २५ जणांना बाहेर काढण्यात आलंय. विचित्र घटनांनी २०२० हे वर्ष खच्चून भरलेलं असतानाच वर्षाचा शेवटचा दिवस अपघातवार ठरलाय.
