टीआरपी घोटाळा : अर्णब यांच्या नावासह दुसरं आरोपपत्र दाखल !

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी : टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट (टीआरपी) घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मंगळवारी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरुद्ध दुसरे आरोपपत्र दाखल केले आहे. याप्रकरणी तक्रार नोंदवल्यानंतर नऊ महिन्यांनी पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांचे नाव आरोपपत्रात दाखल केले आहे.
पोलिसांनी कोर्टात १,८०० पानांचे पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे, ज्यात गोस्वामी आणि एआरजी आऊटलर मीडिया यांच्यासह आणखी चार लोकांची नावे आहेत. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत १५ जणांना दोषी ठरवले होते. ज्यामध्ये जीन ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च कौन्सिल (बीएआरसी) इंडियाचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता आणि रिपब्लिक टीव्हीच्या सीईओ विकास खानचंदानी यांचा समावेश आहे.
२४ मार्च रोजी मुंबई उच्च न्यायालयाने गोस्वामी यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर अटकेपासून मर्यादित संरक्षण दिले होते. याचिकेमध्ये पोलीस, विशेषत: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरूद्ध गंभीर स्वरुपाचे गैरवर्तन केल्याचा आरोप अर्णब गोस्वामीने केला होता.
रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि दासगुप्ता यांच्यातील ‘व्हॉट्सअॅप’ संवादातून त्यांचा ‘टीआरपी’ घोटाळा उजेडात आला होता. व्हॉट्सअॅप चॅटच्या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला होता. त्यानंतर दासगुप्ता यांना अटक झाली होती. बडतर्फ एपीआय सचिन वाजे यांनी सुरुवातीला या प्रकरणाचा तपास केला होता. ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च कौन्सिल (बीएआरसी) कडून पैसे घेतल्याचा आरोप यावेळी करण्यात आला होता.
कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्रात गोस्वामीविरोधात ठाम पुरावे असल्याचे गुन्हे शाखेचे मत आहे. व्हॉट्सअॅप चॅटचाही या आरोपपत्रामध्ये समावेश करण्यात आला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये टीआरपी कथित घोटाळा उघडकीस आल्यानंतर रेटिंग एजन्सी बीएआरसीने हंसा रिसर्च ग्रुप (एचआरजी) मार्फत तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार काही टीव्ही चॅनेल्स टीआरपीचे क्रमांक वाढवत असल्याचा आरोप करण्यात आला होता.