EDITORS POINT : पाटकर, चोडणकरांच्या दोन दिशा

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी
एडिटर्स पॉइंट : गोवा प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर हा पूर्णतः नवा चेहरा. त्यांचे काँग्रेस पक्षाशी कौटुंबिक संबंध जरी असले तरी पाटकर हे स्वतः पक्ष संघटनेत कधीच सक्रीय नव्हते. मागच्या 2022 च्या निवडणूकीत कुडचडे मतदारसंघातून त्यांनी पक्षाची तिकिट मिळवली आणि ते नावारूपास आले. तिथे त्यांनी भाजपचे निलेश काब्राल यांना जोरदार टक्कर दिली. आर्थिक ताकदीत ते उजवे ठरल्यामुळे काही स्थानिक नेत्यांच्या नजरेत ते भरले. सत्तेविना गलीतगात्र बनलेल्या काँग्रेसला नवसंजीवनी द्यायची झाली तर खिशातून पैसे खर्च करणारा प्रदेशाध्यक्ष हवा, या विचारानेच हे पद त्यांच्याकडे आले.

दुसरीकडे सर्वंच बेडके पक्षातून उड्या मारून भाजपात जात असताना काँग्रेसचा तंबू एकहाती आपल्या निष्ठेच्या बळावर शाबूत ठेवलेले गिरीश चोडणकर. त्यांची पक्षनिष्ठा वादातीत पण त्यांच्याच इतर सहकाऱ्यांना झोंबणारी. बरीच वर्षे केंद्राशी संबंधीत असल्यामुळे आणि संघटनेत सक्रीयपणे काम केल्यामुळे त्यांना दिल्लीत मोस्ट एक्सेस होता. तोच त्यांचा प्लस पाँईंट ठरला. 2012 नंतर काँग्रेसची पडझड सुरू असताना गिरीश चोडणकर यांनी काँग्रेसला तारले पण निवडणूकीत यश मिळू शकले नाही. 2017 मध्ये लुईझिन फालेरो यांनी प्रदेशाध्यक्षपदाची सुत्रं हाती घेतली. गिरीश चोडणकरांनीही त्यांना साथ दिली आणि या निवडणूकीत पुन्हा एकदा काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयाला आला. पण अंतर्गत हेवेदाव्यांचा संसर्ग पुन्हा बळावला आणि होत्याचे नव्हते झाले. फालेरो यांनी आपल्यावरील अन्यायाचा वचपा 2022 च्या निवडणूकीत काढून काँग्रेसला रामराम ठोकला. पुन्हा गिरीष चोडणकरांकडेच सुत्रं आली. 2022 च्या निवडणूकीत काँग्रेसचा भ्रमनिरास झाल्यानंतर चोडणकरांनी स्वेच्छेने राजीनामा दिला आणि श्रेष्ठांनी तो मान्य केला आणि अखेर पाटकर यांच्याकडे पक्षाध्यक्षपदाची सुत्रं आली.

हात
धरून निवडून यायचं आणि मग कमळ
पकडायचं…
पक्ष संघटनेत सक्रीय काम नसताना अचानक एक नवा चेहरा आणून पक्षाध्यक्षपदावर बसवला जाणं काँग्रेसच्या लोकांना पसंत पडणारच नव्हतं. पण डुबणाऱ्या होडीला काठावर नेण्यासाठी कुणीतरी वल्हवण्याची गरज होती. ती गरज अमित पाटकर यांच्या रूपात काँग्रेसला मिळाली. पाटकर यांना या पदावर बसवण्यासाठी ज्या नेत्याने मुख्य भूमीका बजावली तो नेताच भाजपच्या गळाला लागला आणि आपल्या इतर सहकाऱ्यांसोबत भाजपात दाखल झाला म्हटल्यावर अमित पाटकर यांची काही प्रमाणात गोची झाली. पाटकर यांनी मात्र यावेळी त्याच नेत्याच्या विरोधात सभापतींकडे अपात्रता याचिका दाखल करून आपण प्रदेशाध्यक्षपदाला न्याय देणार असल्याची भूमिका घेतली.

गिरीश चोडणकर यांच्या गटाने पाटकरांबाबत असहकाराची भूमिका घेतल्याने ते अगडळीत पडले आहेत आणि त्यातच पाटकर यांनी आपली एक स्वतंत्र टीम तयार केली आहे.विशेष म्हणजे चोडणकरांची टीम पुन्हा गिरीषच प्रदेशाध्यक्ष बनतील, याबाबत ठाम आहेत तर पाटकर गटातील लोक चोडणकर आणि त्यांच्या टीमचे अनेक चटकदार किस्से सांगत आहे. या आपापसातील गटबाजीमुळे सर्वसामान्य काँग्रेसचा कार्यकर्ता मात्र हताश बनला आहे. एकमेकांविरोधातील ही कुरघोडी अशीच सुरू राहीली तर काँग्रेस पक्ष बलाढ्य भाजपचा सामना करू शकणार नाही आणि यातूनच काँग्रेसचे कार्यकर्ते आणि हीतचिंतक अन्य पर्यायाचा शोध घेत आहेत हे वास्तव आहे. शेवटी काँग्रेसचे हात चिन्ह हे आपोआप निवडणूकीच्या काळात चार्ज होतं आणि तिथं अनेकांचं भवितव्य फळतं. हे माहित असलेले लोक काँग्रेसला चिकटून बसले आहेत. पण फक्त निवडून येण्यासाठी काँग्रेसचा हात पकडायचा आणि निवडून आल्यावर त्या हातात कमळ घ्यायचं ही जर अप्रत्यक्ष परंपराच पुढे चालू राहणार असेल तर मात्र सर्वसामान्य लोकांचा तो विश्वासघातच ठरणार आहे. अशा या विचित्र परिस्थितीत अडकलेल्या काँग्रेसला कसे काय बाहेर काढणार हा विचार काँग्रेसच्या धुरीणांना पडला आहे.
आजोबांचे शब्द आठवत असतील
गोव्यातल्या काँग्रेसबद्दल आता राहूल गांधी हे देखील गंभीर असतील असे वाटत नाही. वैयक्तीक स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाण्याची तयारी इथल्या नेत्यांची असते. ज्या लोकांना काँग्रेसने भरभरून दिले ते नेतेही शेवटी विश्वासघातकी ठरले याचा अनुभव गांधी घराण्याने घेतला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी गोंयकारांना अजीब म्हणून संबोधले होते. आजोबांचे हे शब्द राहूल गांधी यांनाही आता खरेच वाटणार आहे. जेमतेम 2 लोकसभा जागा असलेल्या या राज्यासाठी किती म्हणून ताकद पणाला लावावी याला काही तरी मर्यादा असाव्यात आणि त्या हेतूनेच त्यांच्याकडून गोव्याकडे विशेष लक्ष दिलं जात नसावं, असं वाटतं.

नेतृत्वाचा अभाव
आजच्या घडीला काँग्रेसकडे नेतृत्वाचा अभाव आहे. सगळेच नेते भाजपवासी झाल्यामुळे असा एकही नेता पक्षाकडे राहीलेला नाही जो सर्वांना सोबत घेऊन पुढे जाऊ शकेल. इच्छाशक्ती असलेले बरेच जण आहेत पण त्यांना अद्याप ती मान्यता प्राप्त झालेली नाही. आत्तापर्यंत पक्षाकडून मिळणाऱ्या पैशांवर पक्ष संघटना चालवणारे अनेकजण या आर्थिक विवंचनेच्या काळात पक्षापासून दोन हात दूरच आहेत. आपल्या खिशातला पैसा खर्च करावा लागेल याची त्यांना चिंता आहे. निवडणूका जवळ आल्या की मग उडी टाकायची आणि सक्रीय व्हायचे. काँग्रेसच्या हाताचा आशिर्वाद मिळाला आणि आपले नशीब फळले तर बरेच झाले,असा त्यामागे स्वार्थी हेतू असतो. मग पक्षाचीही अगतिकताच ठरते आणि अशा लोकांना जवळ करण्यावाचून काहीच पर्याय राहत नाही.

आमदारांबाबत लोकांना साशंकता
काँग्रेसचे सध्याचे तीन आमदार विधानसभेत आहेत. युवा आमदार तथा पहिल्यांदाच विधानसभेत निवडून आलेले पण दीर्घ राजकीय अनुभव असलेल्या आलेमांव कुटुंबातून आलेले युरी आलेमाव यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद आहे. आलेमाव कुटुंबाचा राजकीय इतिहास आणि संधीसाधू राजकारणामुळे युरी आलेमाव यांच्याबाबतीत लोकांचे पूर्वग्रह असणे स्वाभावीक आहे. हे पूर्वग्रह खोटे ठरवून लोकांच्या मनांत नवा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांना बराच वावर करावा लागेल.

दुसरीकडे एड. कार्लूस फेरेरा आणि आल्टोन डिकॉस्ता. या दोघांचीही नावे भाजपमध्ये जाणाऱ्या आमदारांत होती. शेवटी हे दोघेही पक्षात राहीले खरे पण त्यांच्यावर भिस्त ठेवण्या इतपत तरी परिस्थिती नाही. कार्लूस फेरेरा हा ज्येष्ठ वकिल आहेत. कायद्याचे त्यांना ज्ञान आहे. राज्याचे एडव्होकेट जनरल म्हणूनही त्यांनी काम केलंय. पण त्यांचे वय आणि त्यांच्या इतर मर्यादा पाहता पक्षाला राज्यभरात घेऊन जाण्याची ताकद त्यांच्यात दिसत नाही. अशा परिस्थितीत पक्षाचे काम राज्यभरातील कानाकोपऱ्यात कसे काय नेता येईल आणि जुन्या कार्यकर्त्यांना आणि हीतचिंतकांना पुन्हा पक्षाकडे कसे वळवता येईल, यासाठीचा कोणताच प्लान पक्षाकडे दिसत नाही.

कर्नाटक यशाचा परिणाम होईल ?
कर्नाटक राज्यातील काँग्रेसच्या अभूतपूर्व यशामुळे देशभरातील काँग्रेस पक्ष संघटनेत एक नवं चैतन्य पसरलं आहे. आता खरोखरच पुन्हा उभारी घेणं शक्य नाही, अशी स्वतःची समजूत काढण्याच्या नदात असलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना कर्नाटकच्या यशामुळे अचानक एक नवे बळ प्राप्त झाले. फिनिक्स पक्षाप्रमाणे काँग्रेस पुन्हा एक उंच भरारी घेऊ शकेल, असे वाटण्याजोगा आत्मविश्वास प्राप्त करून देणारा हा निकाल ठरला. कर्नाटकच्या उत्तरेकडील शेजारी राज्य म्हणजे गोवा.

गोवा मुक्तीच्या 62 वर्षांत प्रारंभी खातंच सुरू करू न शकलेल्या काँग्रेसला सत्तेवर येण्यासाठी 1980 पर्यंत वाट पाहावी लागली. त्यानंतर सर्वाधिक काळ हा पक्ष सत्तेवर राहीला. प्रादेशिक पक्षांचे आमदार फोडून सत्तेवर बराच काळ मांड ठोकून बसलेल्या काँग्रेसला भाजपने त्याच मोडस ऑपरेंडीचा उपयोग करून सत्तेबाहेर फेकले . गेली 10 वर्षे सत्तेबाहेर राहीलेल्या काँग्रेसची परिस्थिती पिसे गळालेल्या कोंबड्यासारखी बनली आहे. आता उडायचा जरी विचार केला तरी पहिल्यांदा पिसे तरी फुटायचा अवधी लागेल. आता हा अवधी आला आहे खरा परंतु अंतर्गत हेवेदाव्यांचा रोग कसा काय मिटवता येईल आणि एकसंध बनून पक्षाला कसं काय पुढे नेता येईल, यावरून पक्षात गंभीर चर्चा होणं गरजेचं आहे पण ते होताना दिसत नाही.
पाटकर- चोडणकरांनी एकत्र येण्याची गरज
सध्याच्या परिस्थितीत पाटकर- चोडणकरांनी एकत्र येण्याची गरज आहे. आपापसातील मतभेद दूर सारून पक्षाला नवसंजीवनी देण्याचा मास्टर प्लान त्यांनी तयार करायला हवा.श्रेष्ठींसमोर तसा प्लान सादर करून विश्वास संपादन करायला हवा. पण हे सगळं न करता केवळ कुणाचे तरी जासूस किंवा स्पाय बनून काँग्रेस पक्षात वावरण्याचा हा डाव असेल तर ही तडजोड कधीच होणे शक्य नाही. आता प्रामाणिक कोण आणि गुप्तहेर कोण, हे मात्र शोधून काढण्याची भूमिका श्रेष्ठींना पार पाडावी लागेल. तेवढी तयारी श्रेष्ठींना करावीच लागेल. श्रेष्ठींनी आपली सगळी ताकद पणाला लावून प्रामाणिक आणि अंतर्गत शत्रू याचा शोध लावून पक्षाची धुरा प्रामाणिकतेच्या हातात देण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पार पाडावी अन्यथा काँग्रेसचा हा वनवास कधीच संपणार नाही हेच खरे.
