खाणप्रश्नी आरोप करणारे काँग्रेस नेते खोटारडे!

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी : माजी संरक्षणमंत्री व गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्यावर त्यांच्या निधनानांतर बिनबुडाचे आरोप करणाऱ्या काँग्रेस पार्टीने पूर्वी इतिहास तपासून पहावा. काँग्रेसचे तकलादू आरोप पाहता ‘सौ चुहे खाके बिल्ली चली हाज’ ही म्हण काँग्रेसला तंतोतंत लागू होते, असेच म्हणावे लागेल. पर्रीकरांच्या विरोधात आरोप करून आपले पाप झाकण्याचा हा काँग्रेसी प्रयत्न अत्यंत निंदनीय व निषेधार्ह आहे, असे भाजपचे सरचिटणीस नरेंद्र सावईकर यांनी म्हटलंय.
काँग्रेस सरकारच्या काळातच अनागोंदी!
सावईकर म्हणाले, गोव्यात अमर्याद खाण उतखनन व वाहतूक झाली ती काँग्रेस सरकारच्याच काळात. जस्टीस शाह कमिशनची नियुक्ती केली ती काँग्रेसच्या डॉ. मनमोहनसिंग सरकारनेच. सदर कमिशनचा अहवाल त्याच काँग्रेस सरकारने स्वीकारला व संसदेसमोर ठेवला. पर्यावरण परवाने देखील त्याच काँग्रेस सरकारातील तत्कालीन पर्यावरणमंत्री जयंती नटराजन यांनीच निलंबित केले. या परिस्थितीतून मार्ग काढत खाण अवलंबित जनतेला आर्थिक मदतीचा आधार दिला तो स्व. पर्रीकर, नंतर पार्सेकर व आता डॉ. सावंत यांच्याच सरकारने.
खाण प्रश्न सोडवण्यासाठी भाजपचे प्रामाणिक प्रयत्न!
सावईकर म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश व घालून दिलेल्या निर्देशनुसार खाण वाहतूक भाजपा सरकारनेच सुरू केली व त्यामुळे हजारो लोकांना मदत झाली. खाण संबंधी प्रश्न सोडवण्यासाठी भाजपच्या सर्व सरकारानी अत्यंत प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. खाण प्रश्न सोडवण्यासाठी आताचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सरकारी व न्यायालयीन पातळीवर जोरदार प्रयत्न चालवले आहेत. निवडणुका जवळ आल्या की आरोप करणे आलेच.पण त्याहीपेक्षा ते धादांत खोटे व वस्तुस्थिती विपरित आहे व हे केवळ काँग्रेसच पार्टीच करू शकते. गोव्यातील काँग्रेस पक्ष व त्यांचे नेतृत्व सैरभैर झाले असल्याचेच हे द्योतक आहे.
भूलथापाना जनता बळी पडणार नाही!
भारतीय जनता पार्टी व पार्टीचे सरकार जनतेच्या व गोव्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत समर्पितपणे काम करीत असून काँग्रेसच्या भूलथापाना गोव्यातील जनता बळी पडणार नाही हे त्यांनी ध्यानात ठेवावे, असे सावईकर म्हणाले.