EDITORS POINT | पंचसदस्य ते राज्यसभा खासदार, सदानंद शेट तानावडेंची राजकीय गरूडभरारी

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद म्हाळू शेट तानावडे यांची अखेर गोव्याचे पाचवे राज्यसभा खासदार म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. गुरूवार 13 जुलै रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. ह्यात भाजपतर्फे तानावडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. उमेदवारी अर्ज छाननीनंतर 18 जुलै रोजी त्यांची अधिकृत निवड जाहीर होईल. बार्देश तालुक्यातील मुळ पिर्ण या गांवचे सदानंद शेट तानावडे हे गोव्यातून राज्यसभेवर निवड झालेले पहिले उत्तर गोव्यातील नेते आहेत.
राजकारणात पंच, उपसरपंच, सरपंच, आमदार आणि खासदार असा त्यांचा चढता आलेख राहीला आहे तर पक्षसंघटनेत बुथ अध्यक्ष, मंडळ अध्यक्ष, सचिव, महासचिव आणि प्रदेशाध्यक्ष बनण्याचा मान त्यांना प्राप्त झाला. पक्ष संघटना आणि राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवलेल्या सदानंद शेट तानावडेंची राज्यसभेवर झालेली निवड त्यामुळे स्पेशल ठरते. विनय तेंडूलकर यांच्यानंतर राज्यसभेवर सदानंद शेट तानावडे यांची निवड म्हणजे भाजप पक्ष संघटनेत सर्वसामान्य कार्यकर्त्याचा प्रामाणिकपणा, निष्ठा आणि मेहनत याला वाव असल्याचे द्योतक आहे. केवळ दिल्लीत श्रेष्ठींशी जवळीक साधून स्वतःची राज्यसभेवर निवड करून घेण्याच्या काँग्रेसच्या परंपरेला हा फार मोठा हादरा आहे.

1987 पासून गोव्याला राज्यसभा खासदार
19 डिसेंबर 1961 रोजी गोवा मुक्त झाला. प्रारंभी गोवा दमण आणि दीव संघप्रदेश होता. या काळात गोवा दमण आणि दीव विधानसभेत गोव्याचे 28 तर दमण आणि दीवचे प्रत्येक एक मिळून एकूण ३० आमदार होते. प्रारंभी 1962 साली लोकसभेवर गोव्यातून उत्तर आणि दक्षिण गोवा मिळून दोन नियुक्त खासदार निवडण्यात आले. यानंतर 1963 सालापासून लोकसभेसाठी निवडणूकीव्दारे गोवा दमण आणि दीव संघप्रदेशात गोव्यातून दोन लोकसभा खासदारांची निवड होत आहे.
गोव्याला 30 मे 1987 रोजी घटकराज्याचा दर्जा प्राप्त झाला. यानंतर थेट 28 विधानसभा आमदारांवरून गोवा विधानसभा आमदारांची संख्या 40 झाली. लोकसभेच्या खासदारांची संख्या पूर्वीची दोनच राहीली पण त्यात एका राज्यसभा खासदाराची भर पडली. 1987 सालापासून गोव्यातून एक राज्यसभा खासदार निवडला जातो.
राज्यसभा म्हणजे भारतीय संसदेतील वरीष्ठ (अपर हाऊज) आहे. राज्यसभेत एकूण २५० सभासद असतात. त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील म्हणजेच (कला, साहित्य, विज्ञान आणि समाजसेवा) आदी क्षेत्रात काम केलेल्या मान्यवरांमधून करतात. इतर २३८ सभासदांची निवड राज्य आणि केंद्रशासित प्रदेश विधिमंडळ करतात. राज्यसभेचा कार्यकाळ ६ वर्षांचा असतो. राज्यसभा हे स्थायी सभाग्रह आहे. कारण दर दोन वर्षांनी एक तृतीयांश (one third) सभासद निवृत्त होतात आणि पुन्हा नव्याने तेवढेच सभासद निवडले जातात. राज्यसभेला लोकसभेपेक्षा कमी अधिकार आहेत, शिवाय आर्थिक विधेयके लोकसभेत मंजूर झाल्यानंतर त्यांना राज्यसभेतही मंजूरी मिळवावी लागते. भारतीय उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. राज्यसभेच्या उपाध्यक्षांची निवड सदस्य मतदानाने होते. अध्यक्षांच्या गैरहजरीत उपाध्यक्ष सभेचे कामकाज पाहतात.

गोव्याचे राज्यसभा खासदार |
जॉन फर्नांडिस (काँग्रेस) |
पहिला टर्म- 8 जुलै 1987 ते 7 जुलै 1993 |
दुसरा टर्म- 8 जुलै 1993 ते 7 जुलै 1999 |
————— |
एदूआर्द फालेरो (काँग्रेस) |
टर्म- 29 जुलै 1999 ते 28 जुलै 2005 |
——————- |
एड. शांताराम नाईक (काँग्रेस) |
पहिला टर्म- 29 जुलै 2005 ते 28 जुलै 2011 |
दुसरा टर्म- 29 जुलै 2011 ते 28 जुलै 2017 |
———————- |
विनय तेंडुलकर (भाजप) |
टर्म- 29 जुलै 2017 ते 28 जुलै 2023 |
—————— |
सदानंद शेट तानावडे (भाजप) |
टर्म- 18 जुलै 2023 ते पुढे चालू |
——————————- |
इतर राज्यांतून नियुक्त झालेले गोमंतकीय राज्यसभा खासदार |
स्व. मनोहर पर्रीकर (भाजप) |
टर्म- 2014 ते 2017 (राजीनामा) |
देशाचे केंद्रीय सरंक्षणमंत्री |
—————— |
लुईझिन फालेरो (टीएमसी) |
टर्म- सप्टेंबर ते नोव्हेंबर 2021 (राजीनामा) |
गांधी घराण्याच्या कृपादृष्टीने काँग्रेस खासदारांची वर्णी
गोव्यातून राज्यसभेवर पहिल्यांदा निवड झालेले नेते होते जॉन फर्नांडिस. जॉन फर्नांडिस हे त्यावेळी माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या खास विश्वासातले. गोवा प्रदेश युवा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून ते काम पाहत होते. राज्यसभेवर एखाद्या वरिष्ठ, जाणकार आणि अनुभवी नेत्याची निवड व्हावी असे सर्वांना वाटत होते. तत्कालीन स्वातंत्र्यसैनिक आणि ज्येष्ठ वकिल पांडुरंग मुळगांवकर यांच्या नावाची चर्चा होती. परंतु जॉन फर्नांडिस यांनी दिल्लीत आपली फिल्डिंग लावून अखेर हे पद आपल्या पदरात पाडून घेतले. यानंतर दुसऱ्या टर्मवेळी काँग्रेसच्या काही नेत्यांनी कामगार नेते केशव प्रभू यांचे नाव पुढे केले होते, अशी माहिती एका ज्येष्ठ पत्रकाराने दिली.

केशव प्रभू यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याने त्यांनी आपली नोकरीही सोडली होती परंतु एनवेळी पुन्हा जॉन फर्नाडिस डेरेदाखल झाले आणि त्यांची गांधीनिष्ठा फळाला आली आणि ते दुसऱ्यांदा राज्यसभा खासदार बनले. आपल्या दोन टर्मच्या कार्यकाळात राज्यसभा खासदार म्हणून नोंद करण्यासारखे काहीच काम जॉन फर्नांडिस यांच्याकडून घडले नाही. जॉन फर्नांडिस यांच्या निवडीनंतर राज्यसभेवर जाण्यासाठी गांधी कुटुंबाचीच मेहरबानी लागते हे तोपर्यंत स्पष्ट झाले होते.
शांताराम नाईक यांचे प्रभावी काम
1999 मध्ये जॉन फर्नांडिस यांचा दुसरा टर्म संपूष्ठात आला होता. तिसरे राज्यसभा खासदार कोण होणार असा प्रश्न उपस्थित झाला असताना तिथे माजी लोकसभा खासदार आणि माजी केंद्रीयमंत्री एदूआर्द फालेरो यांचे नाव पुढे आले. 1977 ते 1996 पर्यंत सतत पाच वेळी दक्षिण गोव्यातून लोकसभेवर निवडून येण्याचा विक्रम एदूआर्द फालेरो यांनी केला होता. केंद्रात महत्वाचं केंद्रीय मंत्रीपद त्यांना मिळाल होतं आणि आपल्या कामातून त्यांनी आपली एक चांगली प्रतिमा तयार केली होती.

1996 च्या लोकसभा निवडणूकीत युगोडेपातर्फे चर्चिल आलेमाव यांनी एदूआर्ल फालेरो यांचा पराभव केला. या निवडणूकीत उत्तर आणि दक्षिणेतून काँग्रेसचा पत्ता साफ झाला होता. उत्तर गोव्यातून या निवडणूकीत एड. रमाकांत खलप जिंकले होते. लोकसभा निवडणूकीत पराभूत झालेल्या एदूआर्द फालेरो यांची अखेर गांधी कुटुंबियांच्या पसंतीनेच राज्यसभेवर वर्णी लागली आणि ते दुसरे राज्यसभा खासदार बनले.
यानंतर 2005 मध्ये एड. शांताराम नाईक यांची राज्यसभेवर वर्णी लागली. ते गांधी घराण्याचे जवळचे होतेच परंतु ते तेवढेच सक्रीय राजकारणी होते. वेगवेगळ्या विषयांवर अभ्यास करून विवेचन करणे हा त्यांचा जमेचा भाग. 1984 साली ते उत्तर गोव्यातून लोकसभेवर खासदार म्हणून निवडून आले होते. त्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी होताच.

राज्यसभेचे सर्वांत एक्टीव खासदार म्हणून त्यांनी आपली ओळख तयार केली. झिरो अवरचे हिरो असं त्यांना म्हटलं जातं होतं खरं परंतु राज्यसभेच्या शुन्य प्रहराला वेगवेगळे विषय उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधण्यात ते यशस्वी झाले होते. आपल्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी बजावलेल्या कामगिरीवर खूष होऊन त्यांना सन्मानाने दुसरा टर्म देण्यात आला. जॉन फर्नांडिस यांच्यानंतर दोन टर्म राज्यसभा खासदार बनण्याचा मान त्यांना प्राप्त झाला.
भाजपचे अच्छे दिन
राज्यात 2012 मध्ये काँग्रेसची सत्ता गेली आणि केंद्रात 2014 मध्ये मोदी पर्वाला सुरूवात झाली. सहजिकच भाजपचे अच्छे दिन सुरू झाले. 2017 मध्ये शांताराम नाईक यांचा कार्यकाळ संपल्यानंतर राज्यसभेवर खासदार निवडण्याची संधी भाजपला मिळाली. गोवा प्रदेश भाजपचे अध्यक्षपद विनय तेंडुलकर यांच्याकडे होते. मनोहर पर्रीकर यांनी केंद्रीय सरंक्षणमंत्रीपदाचा राजीनामा देऊन पुन्हा गोव्यात मुख्यमंत्रीपद स्वीकारलं होतं. मंत्रिमंडळ सदस्यसंख्येवर मर्यादा आल्याने मनोहर पर्रीकर यांच्या विनंतीवरून थेट आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा त्यांनी 2002 मध्ये दिला होता.

त्यांच्या या राजकीय त्यागाचे फलित म्हणून पर्रीकरांनी राज्यसभेसाठी त्यांची निवड केली. प्रदेशाध्यक्ष या नात्याने 2014 मध्ये दोन्ही लोकसभेच्या जागा भाजपने जिंकल्या होत्या. 2017 च्या निवडणूकीत भाजपचा दारूण पराभव झाला पण भाजपची सत्ता राज्यात स्थापन होऊ शकली. या सर्वांची परतभेट म्हणून विनय तेंडुलकर राज्यसभेवर पोहचले. त्यांच्या रूपात भाजपला अगदी बुथ स्तरापासून ते प्रदेशाध्यक्षापर्यंत झेप घेतलेला एक सामान्य कार्यकर्ताला राज्यसभा खासदार बनण्याचा मान मिळाला. तिकडे लोकसभेवर श्रीपाद नाईक यांच्या रूपात असाच कार्यकर्ता केंद्रीयमंत्रीपदावर होताच.

राज्यसभेत प्रत्यक्ष आपल्या भाषणातून प्रकाशझोतात जरी तेंडुलकर आले नसले तरी त्यांनी अनेक तारांकित आणि अतारांकित प्रश्न मात्र विचारून आपली नोंद राज्यसभेत ठेवली आहे. कोविडच्या काळातही त्यांनी राज्यसभा खासदार म्हणून आपले योगदान दिले. त्यांचा कार्यकाळ 28 जुलै 2023 रोजी अधिकृत पद्धतीने संपूष्टात येतोय. विनय तेंडुलकर हे पुन्हा आता गोव्यात दाखल झाल्यामुळे ते आता स्थानिक राजकारणात सक्रीय बनण्याची शक्यता आहे. सावर्डे मतदारसंघातून ते पुन्हा आपल्या कार्याला सुरूवात करणार असल्याचे त्यांचे कार्यकर्ते आत्ताच उघडपणे सांगू लागले आहेत.

पंच ते खासदार आणि बुथ सदस्य ते प्रदेशाध्यक्ष
सदानंद म्हाळू शेट तानावडे. जन्म 31 जानेवारी 1967 रोजी बार्देश तालुक्यातील पिर्ण या गांवी. शिक्षण एम. काँम, डीएमए आणि डीपीएम. मेसर्स महालक्ष्मी advertising agency आणि SAI KRUPA ENTERPRISES ही त्यांची व्यवसायीक फर्म्स. पिर्ण ग्रामपंचायतीचे पंच पंच आणि नंतर सरपंच अशा सतरा वर्षांच्या कार्यकाळातून त्यांचा राजकारण प्रवेश झाला. पीर्ण ग्रामसेवा मंडळाचे श्री शांतादुर्गा विद्यालय व शांतादुर्गा हायर सेकंडरी तसेच श्री शांतादुर्गा प्रायमरी शाळेचे ते चेअरमन आहेत.
विद्यार्थी ते चेअरमन बनण्याचा विशेष बहुमान त्यांना यानिमित्ताने प्राप्त झाला. म्हापशातील जन उत्कर्ष क्रेडिट सोसायटीचे ते डायरेक्टर आहेत. पिर्ण पंचायतीच्या त्यांच्या कार्याची दखल घेत भाजपची नजर त्यांच्यावर वळली. प्रारंभी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निमित्ताने ते भाजपकडे वळले.

स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वावर फिदा झालेले तानावडे आपोआप भाजपवासी झाले. मंडळ अध्यक्ष म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर मंडळ अध्यक्ष आणि 2002 मध्ये पक्षाचे थिवी मतदारसंघाचे उमेदवार आणि थिवीचे पहिले भाजपचे आमदार बनण्याचा मान त्यांना प्राप्त झाला. या काळात त्यांच्याकडे महत्वाच्या राज्य पर्यटन विकास महामंडळाचे चेअरमन देण्यात आले.
हे पद त्यांनी यशस्वीपणे भूषवले. राजकारणामुळे त्यांनी आपल्या खाजगी नोकरीला रामराम केला आणि पूर्णवेळ राजकारणात सक्रीय बनले. 2007 च्या निवडणूकीत त्यांचा अवघ्या काही मतांनी पराभव झाला. पण त्यांनी हार कधीच मानली नाही. पक्ष कार्यात त्यांच्याकडे महत्वाच्या जबाबदाऱ्या येत राहील्या. बुथ अध्यक्ष, मंडळ अध्यक्ष, सचिव, सरचिटणीस आणि अध्यक्ष अशी झेप ते घेत राहीले.
2012 च्या विधानसभा निवडणूकीत भाजपला सत्ता मिळवणे गरजेचे होते. मगो पक्षाकडे युती करण्यात आली होती. किरण कांदोळकर यांनी थिवी मतदारसंघात आपले काम बरेच वाढवले होते. अशावेळी पक्षाने उमेदवारी किरण कांदोळकरांना देण्याचे ठरवले. तानावडेंनी हा निर्णय अखेर मान्य केला. थिवीत त्यांना काम करणे कठीण होते पण त्यांनी अन्य मतदारसंघ कामासाठी निवडला, पण बंड न करता पक्षाची साथ दिली आणि किरण कांदोळकर निवडून आले. तानावडेंनी केलेला हा त्याग पक्ष विसरला नाही. पक्षात त्यांना महासचिवपद मिळाले.

2017 च्या निवडणूकीतही त्यांनी पक्ष संघटनेतच काम करण्याचे ठरवले आणि निवडणूकीत न उतरणेच पसंत केले. राजकारणात संयम हा महत्वाचा असतो आणि त्याचे फलित त्यांना मिळाले. २०१७ च्या निवडणूकीत भाजपचा पराभव झाला पण सत्ता भाजपकडे आली त्यावेळी ते महासचिव होते. विनय तेंडुलकांचा कार्यकाळ संपल्यानंतर अखेर 12 जानेवारी 2020 मध्ये सदानंद शेट तानावडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बनले. ते प्रदेशाध्यक्ष बनल्यानंतर पंचायती, जिल्हा पंचायती, पालिका आदी निवडणूकांत भाजपला घवघवीत यश मिळाले.

एवढेच नव्हे तर 2022 च्या विधानसभा निवडणूकीत भाजपने स्वबळावर निवडणूक लढवून २० जागा जिंकत नवा विक्रम संपादन केला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे ही जोडगोळी विरोधकांना पुरून उरली. विरोधी काँग्रेसच्या विरोधी पक्ष नेत्यांसह दोन तृतीयांश गट भाजप विधीमंडळात सामावून घेण्याचा राजकीय सर्जिकल स्ट्राईक सदानंद शेट तानावडे आणि डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालीच पार पडला.

उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमधून गोव्याचे खासदार
सदानंद शेट तानावडे हे गोव्यातून राज्यसभेवर निवडून आलेले पाचवे खासदार ठरले खरे परंतु या व्यतिरीक्त अन्य दोन बडे गोव्याचे राजकीय नेते राज्यसभेचे खासदार बनले पण गोव्यातून नव्हे. 2014 मध्ये केंद्रात भाजपचं सरकार सत्तेवर आल्यानंतर तत्कालीन गोव्याचे मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांना दिल्लीत नेण्याचं ठरलं. त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास लावून उत्तर प्रदेशमधून राज्यसभा खासदारपदी निवडून आणलं आणि नंतर त्यांची वर्णी केंद्रीय सरंक्षणमंत्रीपदी झाली. 2014 ते 2017 पर्यंत पर्रीकर राज्यसभेचे खासदार होते. यानंतर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन टीएमसीमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांची पश्चिम बंगालमधून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली.

तानावडेंना मिळू शकते मोठी संधी
लोकसभेसाठी श्रीपाद नाईक आणि आता राज्यसभेसाठी विनय तेंडुलकरानंतर सदानंद शेट तानावडे यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली आहे. सामान्यांची दखल घेणारा पक्ष म्हणून यानिमित्ताने भाजपला पुन्हा नव्याने झळाळी मिळाली आहे. सदानंद शेट तानावडेंचे आत्तापर्यंतचे पक्ष संघटनेतील काम पाहीले तर भविष्यात 2024 मध्ये केंद्रात पुन्हा भाजपची एकहाती सत्ता आली तर तानावडेंची वर्णी केंद्रीयमंत्रीपदी लागण्यात काहीच अडचण असू शकत नाही. तूर्त पुढील लोकसभेपर्यंत तेच प्रदेशाध्यक्षपदी राहणार आहेत,अशी चर्चा सुरू आहे. तसं झालंच आणि लोकसभेच्या दोन्ही जागा भाजपला मिळाल्या तर राज्यसभेत गोव्याचे प्रतिनिधीत्व करणारी व्यक्ती केंद्रीयमंत्री बनण्याचा मान त्यांना निश्चितच मिळू शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. पण त्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागेल.
