सरकारी जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांची आता खैर नाही!

Goan Varta Live | प्रतिनिधी
साखळी : सराकरी जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांवर तातडीनं कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे सरकारी जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांची आता खैर नाहीये. शासकीय अधिकाऱ्यांनी अतिक्रमणाबाबत लक्ष घालण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्र्यांमनी म्हटलंय. तसंच सरकारी जागेत सुरु असलेलं काम बंद करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. साखळीती बैठकीमध्ये ते बोलत होते.
साखळीत बैठक, काय म्हणाले सावंत?
साखळी नगरपालिकेच्या विकासासंबंधी चर्चा करण्यासाठी बैठक बौलवण्यात आली होती. या बैठकीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण निर्देश दिलेत. यावेळी सर्व प्रमुख खात्यांचे वरिष्ठ अधिकारी, साखळी नगरपालिकेचे नगराध्यक्ष यशवंत माडकर आणि अन्य नगरसेवक उपस्थित होते.
गोव्यातील सरकारी मालकीच्या जागेची राखण करण्याची जबाबदारी ही स्थानिक लोकप्रतिनिधींबरोबर सरकारी अधिकार्यांनी उचलण्याची गरज असल्याचे सांगून मुख्यमंत्री डॉ. सावंत पुढे म्हणाले की..
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागेत होणारे अतिक्रमण संबंधित खात्यातील स्थानिक अधिकार्यांनी तक्रार करून वेळीच जमीनदोस्त करण्याची गरज आहे. सरकारी जागा बळकावण्याची काहींना सवय झालेली असून ती रोखण्यासाठी कडक उपाययोजना आखण्यासाठी सरकारी यंत्रणेने पुढाकार घेण्याची गरज आहे. सरकारी कामांना चालना देण्यासाठी सर्व घटकांनी जबाबदारीने वागण्याची गरज असून राज्याचा वार्षिक महसूल वाढविण्याची व नको असलेला खर्च रोखून धरण्याचे काम केवळ सरकारी अधिकारीच करू शकतात.
व्हिजनची गरज
एखाद्या भागाचा पंचायतीचा, नगरपालिकेचा किंवा तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी सरकारबरोबरच, सरकारी खात्यांची आहे. त्यासाठी ‘व्हिजन डॉक्युमेंट’ तयार करण्याची गरज आहे. विकासाच्या बाबतीत दूरदृष्टीचा टप्पा गाठण्यासाठी सर्व खातेप्रमुखांनी या बाबींकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. सर्व खातेप्रमुखांनी यासंबंधीचा अहवाल तयार करून आपल्या हाताखाली काम करणार्यांकडे देण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
साखळी नगरपालिका क्षेत्राच्या विकासकामासंबंधी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, साखळी नगरपालिकेच्या विकासासंबंधीचा मास्टर प्लॅन तयार करण्यात आलाय. तो गोवा राज्य साधनसुविधा महामंडळाकडे आहे. त्यातील साधारण ४०-५० टक्के विषयांवर चर्चा झाली असून राहिलेले विषय घेण्यासाठी शासन प्रयत्नरत आहे. साखळी नगरपालिकेच्या नगरसेवकांनी त्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.
कडक कारवाई
यावेळी साखळी नगरपालिका क्षेत्रांमध्ये उद्भवलेल्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये वीज खांब्याचे स्थलांतर, लाईनमनची व्यवस्था, वीज जोडणी, साखळी मलनि:सारण प्रकल्पासंबंधी चर्चा झाली. यामध्ये नवीन जोडणी आणि घरातील सांडपाणी सार्वजनिक गटारांमध्ये सोडणार्यांवर कडक कारवाई करण्याचे ठरले.
साखळी भागातील रस्त्यांची डागडुजी, मासळी मार्केट, पार्किंग व्यवस्था, दुकानदारांचे नव्या जागेत पुनर्वसन आदी बाबींवर सविस्तर चर्चा झाली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वरील प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी सर्व खाते प्रमुखांनी कार्यरत राहण्याचे आवाहन केलंय.
मिळवा मोबाईलवर थेट अपडेट्स – इथे क्लिक करा