सांत आंद्रेचे आमदार विरेश बोरकर यांनी लाटंबार्सेच्या ग्रामस्थांना घेऊन कदंब महामंडळाला दिली धडक

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्यूरो रिपोर्ट, पणजी:- कदंब महामंडळ राज्यात किती चांगली वाहतूक सेवा देण्याचे कार्य करत आहे ते सर्वांना माहीत आहे. अजूनपर्यंत राज्याच्या अनेक ग्रामीण भागात कदंबची बस वाहतूक सेवा सुरु झालेली नाही. डीचोली मतदारसंघातील लाटंबार्से पंचायत क्षेत्रात त्याचबरोबर सांत आंद्रेतील अनेक गावातील शाळकरी तसेच कामगार वर्गाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याचेच गांभीर्य लक्षात घेवून रेव्होलुशनरी गोवन्सचे प्रमुख मनोज परब त्याचबरोबर आमदार विरेश बोरकर यांनी लाटंबार्सेतील वडावल गावातील ग्रामस्थांना घेवून जाप विचारण्यासाठी थेट पणजीतील कदंब महामंडळाकडे मोर्चा वळविला.

राज्यात आज अनेक ठिकाणी कदंबच्या बस सेवा उपलब्ध नसल्याकारणाने लोकांना भरपूर त्रास सहन करावा लागत आहे. लाटंबार्सेतील वडावल या गावातील शाळकरी त्याचबरोबर कामगार वर्गाला रोज पहाटे सुमारे चार पाच वाजता उठून पायी प्रवास करावा लागत आहे. सुमारे वीस वर्षापासून स्थानिक लोकांची तिथे बस वाहतुकीची मागणी सरकारकडे केली होती. परंतु आजपर्यंत त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले गेले.
या विषयी मनोज परब व विरेश बोरकर यांनी जाब विचारला असता महामंडळ संचालकाकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. लोकांच्या मागण्या पूर्ण करायला वीस वर्षे लागतात का? आणि गोव्यातील जनतेला बस सेवा देण्यात सरकार टाळाटाळ करते परंतु ह्याच गोवेकर करदात्यांच्या बसेस कर्नाटक निवडणुकीत वापरायला देण्यात सरकारला अडचण नाही, असे मनोज परब यांनी महामंडळ प्रमुखांना विचारले असता त्यांना उत्तर देता आले नाही.
राज्यात अशी अनेक गावे आहेत तिथे सरकारकडून बस वाहतूक देण्यात आली नाही. अनेक शाळकरी मुलांना कित्येक किलोमीटरचा प्रवास पायी करावा लागतो. पाच सहा हजार पगाराच्या नोकऱ्या करत असताना अर्धा पगार हा प्रवासातच खर्च होत असल्याचे काही ग्रामस्थांनी म्हटले.

कदंब महामंडळाच्या संचालकांनी या भेटीदरम्यान कोणतेच समाधानकारक उत्तरे दिली नाही. उलट आपल्याला लोकांच्या बस वाहतूक मागणी संदर्भात काहीच माहिती नसल्याचे बोलले जात होते. परंतु विरेश बोरकर यांनी संचालकांना एकदा तरी त्यांच्या गावात चालत प्रवास करून पाहावे, त्यांचे दुख समजून घ्यावे, त्यांची रोजची धडपड पाहावी आणि त्यांना बस वाहतूक पुरविण्याची विनंती केली.