पेडणे थीम पार्क म्हणजे निव्वळ “लँडस्कॅम”- मनोज परब

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्यूरो रिपोर्ट : पेडणे मतदारसंघातील जनतेला वेळोवेळी राज्य सरकारने त्यांच्या मतदारसंघात मोपा विमानतळ, देल्टीनचा आय.यफ.बी. प्रकल्प असे विविध मेगा प्रकल्प उभारून नोकऱ्यांची आमिषे, स्वप्ने दाखविली. परंतु आजपर्यंत त्यांची स्वप्नपूर्ती ही कधी झाली नाही ते नाहीच, उलट आता सर्व्हे क्रमांक. ३१० आणि सर्व्हे क्रमांक ३११ मध्ये थीम पार्क साकारण्याची जोरदार तयारी सुरू आहे.

रेव्होलुशनरी गोवन्सचे प्रमुख मनोज परब यांनी पत्रकारांशी याबद्दल बोलताना म्हटले की, आजपर्यंत पेडणेकरांच्या जमिनी राज्य सरकारने फक्त लोकांना स्वप्न दाखवून बिल्डर लॉबिंच्या घशात घातल्या आहेत. हा थीम पार्कचा प्रकल्प म्हणजे निव्वळ जमीन घोटाळाच असून लोकांच्या जमिनी हडपण्याचे हे एक षडयंत्र असून, मोपा विमानतळ करण्याच्या नावाने जशी ८४ लाख चौरस मीटर जमीन हडपली व तिथे फिल्म सिटी, डिस्को क्लब, कॅसिनो घालण्याचा प्रयत्न सुरू झाला त्याचप्रकारे थीम पार्कच्या नावाने जमिनी हडपण्याचा हा एक प्रकार असल्याचे मनोज परब म्हणाले.

याआधी हा प्रकल्प मुरगाव तालुक्यातील केळशी, बोगमाळो येथून लोकांनी हा प्रकल्प हाकलून लावला होता . परंतु आता हा थीम पार्क पेडणेकरयांच्या माथ्यावर थोपला गेला आहे. जवळजवळ ९७ हजार चौरस मीटर जागा ही देल्टीनचा मालक जयदेव मोदी यांच्या कंपनीच्या नावावर असून, त्यांनी ती जागा परत ब्रम्हा कोर कंपनीला डिसेंबर २०२२ मध्ये विकली. परंतु राज्य सरकारने संबंधित पंचायतीशी चर्चा न करता, जनतेला विश्वासात न घेता शेत जमिनीत हा प्रकल्प उभारण्यासाठी बंधनं असून सुद्धा मान्यता देण्यात आली. जवळच पेडणेतील कचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प असून, तो सुद्धा दुसरीकडे हलवून, थीम पार्क उभारण्याची तयारी सुरू असल्याचे परब म्हणाले.
पेडणेवासीयांच्या जमिनी हडपण्याचे प्रकार बिल्डर लॉबी कडून सतत होत आले असून, माविन गुदिन्हो स्वतः आय.पी.बी. मध्ये असून त्यांचा भाऊ, रिअल इस्टेट मध्ये गुंतलेला आहे, त्याचबरोबर पेडणे तालुक्यातील दोन्ही आमदार जीत आरोलकर व प्रवीण आर्लेकर हे आज पेडणेकरांच्या जमिनी परप्रांतीयांच्या घशात घालून, पेडणेतील जनतेला रस्त्यावर आणण्याचे षडयंत्र रचत असल्याचेही मनोज परब म्हणाले.

यादरम्यान आर.जी. पक्षाचे पेडणे मतदारसंघातील अध्यक्ष शिवा तांबोस्कर व प्रदीप नाईक यांनी सरकारवर टीका करताना म्हटले की, आजपर्यंत मोपा, व इतर प्रकल्प आणून सुद्धा पेडणेकरांना रोजगार मिळाला नसून ही फक्त आमच्या जमिनी हडपण्याची षडयंत्रं असल्याचे ते म्हणाले.