बापरे! पतंजलीच्या मधात साखरेच्या पाकाची भेसळ

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो : मध खाणार त्याला साखरेचा पाक देणार, हीच बहुधा मधविक्री करणाऱ्या अनेक कंपन्यांची टॅग लाईन झाली आहे की काय, असा संशय व्यक्त केला जातो आहे. कारण सीएसईने समोर आणलेली माहिती सगळ्यांनाच चकीत करणारी अशी ठरली आहे.
नाव मोठं लक्षण खोटं?
रामदेवबाबांचं पतंजलीचं मध मोठ्या प्रमाणात विक्री होतं. पतंजलीचं काय डाबर, बैद्यनाथ, झंडू यांसारख्या कंपन्या मधाची विक्री करतात. पण या कंपन्यांनी बनवलेल्या मधावर आता शंका उपस्थित केली जाते आहे. मधाऐवजी मोठ्या प्रमाणात साखरेचं पाक असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. सीएसई म्हणजेच सेंटर ऑफ सायन्स एन्ड एन्वारमेन्टनं याबाबतचा अहवाल समोर आणला आहे. या अहवालावरुन मधाची विक्री करणाऱ्या सगळ्यांच ब्रॅण्डकडे संशयानं पाहिलं जातंय. सीएसई ही तिच संस्था आहे, जिनं सॉफ्टड्रिग्समध्ये कीटकनाशक असल्याचं म्हटलं होत. ही गोष्ट आहे 2003च्या दरम्यानची. आणि आता याच संस्थेनं मधावरुन नवा अहवाल समोर आणला आहे.
काय आहे अहवालात?
77 टक्के नमुन्यांमध्ये साखरेची भेसळ असल्याचं निष्पन्न
एकूण 22 नमुन्यांची तपासणी, त्यातील फक्त पाचच तपासणीत उत्तीर्ण
पतंजली, डाबर, बैद्यनाथ, झंडू, हितकारी आणि एपिस हिमालय चाचणीत नापास
सफोला, मार्कफेड सोहना आणि नेचर्स नेक्टर परिक्षणात पास
सीएसईच्या अमित खुरांना यांनी समोल आलेल्या धक्कादायक अहवालावरुन चिंता व्यक्त केली आहे. भेसळयुक्त खाद्यांचा व्यापार किती विचित्र पद्धतीनं बाजारात सक्रिय झाला आहे, याचं हे उदाहरण असल्याचं यानिमित्त बघायला मिळत असल्याचं त्यांनी म्हटलंय.
छे..छे आम्ही नाही त्यातले!
दुसरीकडे शंका घेण्यात आलेल्या सर्वच ब्रॅण्डसी आपल्यावरील आरोपांचं खंडन केलंय. सीएसईने दिलेला रिपोर्ट चुकीचा असल्याचं पंतजलीसह डाबर आणि इतरही कंपन्यांनी म्हटलंय. प्राकृतिक गोष्टींचा वापर करुन मधाची विक्री करत असल्याचा दावा या कंपन्यांनी केला आहे. साखरेची मधात भेसळ करत नसल्याचं या कंपन्यांनी म्हटलंय.
पंतजलीचं काय म्हणणंय?
पतंजली आयुर्वेदच्यामे कार्यकारी संचालक आचार्य बालकृष्ण यांनीही पतंजलीच्या मधावर घेतलेल्या आक्षेपाचं खंडण केलंय. आमचं नाव खराब करण्यासाठी कट रचला जात असल्याचं त्यांनी म्हटलंय. सर्व नियमांचं पालन करुन आम्ही मधाची निर्मिती करत असल्याचा दावा त्यांनी केलाय.
एकीकडे सीएसईचा रिपोर्ट आणि दुसरीकडे कंपन्यांनी फेटाळलेले आरोप, यात ग्राहक मात्र गोंधळून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मधाची खरेदी कशी करायची कि आता साखरेचा पाकच खायचा, असा प्रश्न लोकांना पडलाय.