7 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी मोदींनी घेतलेली पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ, त्यानिमित्त खास!

इतिहासात प्रथमच भाजपनं काँग्रेसचा धुव्वा उडवला होता

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : भाजप सरकारला सत्तेत येऊन, आज ७ वर्ष पूर्ण होत आहेत. आजच्या दिवशी बरोबर सात वर्षांपूर्वी पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली होती. मोठ्या दिमाखात हा सोहळा पार पडला होता. त्यानिमित्त ज्येष्ठ पत्रकार-संपादक लेखर भारतकुमार राऊत यांनी फेसबुक पोस्ट लिहित मोदींच्या ७ वर्षांच्या या कार्यकाळाचा आढावा घेतला आहे. भाजप सरकारच्या या ७ वर्षांच्या काळात नेमकं काय काय झालं? कोणत्या राजकीय घडामोडी घडल्या? भाजप कुठून कुठपर्यंत पोहोचलंय?, त्याचा हा एक्सरे रिपोर्ट..

सात वर्षे…!

आज 26 मे. आठ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी देशभर प्रचंड उत्साहाच्या लाटा उसळत होत्या. दिल्लीतील रखरखीत उन्हात शेकडो नागरिक हातातले तिरंगे व भारतीय जनता पक्षाचे झेंडे उंचावत विजय चौक पार करून राष्ट्रपती भवनाच्या दिशेने झेपावत होते. प्रत्यक्ष राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात फारच थोड्या `व्हीआयपीं’ना प्रवेश होता. पण तिथे चालणारा ह्रद्य सोहळा दूरवरून तरी बघायला मिळावा, म्हणून जनतेने जीवाचा डोळा केला होता. देशभर घराघरात टीव्ही सेट्सवर केवळ राष्ट्रपती भवनाचेच चित्रिकरण चालू होते. कारण तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व त्यांच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होत होता.

भारतीय लोकशाहीच्या इतिहासात प्रथमच भाजपने एकहाती सत्ता मिळवून काँग्रेसचा धुव्वा उडवला होता. सोहळा पार पडला व सारे घरोघर गेले, एक नवे स्वप्न, नवी उमेद व नवा विश्वास उराशी घेऊन. आठ वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. मोदींनी निवडणूक प्रचाराच्या वेळी दिलेल्या विविध आश्वासनांची वारंवार आठवण करून दिली जाऊ लागली. त्यांच्या `अच्छे दिन आयेंगे’ या आश्वासनाची खिल्ली उडवली जाऊ लागली. दोन वर्षांच्या वाटेत भाजपने बिहार व दिल्लीच्या निवडणुका गमावल्या. त्याचे खापरही मोदी सरकारवरच फोडले गेले आणि अलिकडेच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांत भाजपने बऱ्यापैकी यश मिळवले व मुख्य म्हणजे काँग्रेसचे आव्हानच भुईसपाट झाले, तरीही मोदी विरोधकांची शस्त्रे काही म्यान होत नाहीत असे दिसू लागले.

हेही वाचा : 26 जुलै | धडकी भरवणारी तारीख आहे कारण…

याला कारण केवळ पक्षीय राजकारण की आणखी काही?

bjp-flag-1200

मोदी सरकारला आज सात वर्षे पूर्ण होत असताना हा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. मोदी सरकारचे सर्व काही कार्य मंगल आणि पवित्र आहे, असे नाही. अच्छे दिन आले, असेही नाही. पण सात वर्षांत निदान त्या दिशेने पाऊले उचलली जाऊ लागली, हे काय कमी आहे? देशातील महागाई पूर्णपणे हटली नाही, हे खरे, पण भाववाढ बऱ्याच अंशी रोखली तर गेली; पावसाने दगा देऊनही अन्न-धान्याची भरमसाठ भावाने आयात करावी लागलेली नाही, हेही खरेच.

मोदींना 2014मध्ये पाच वर्षांसाठी जनादेश मिळाला. नंतर २०१९ मध्ये जनतेने त्यांना अधिक जागा जिंकून दिल्या. याचा अर्थ २०२४ पर्यंत त्यांची राजवट चालणार व तेव्हा त्यांना नवा जनादेश घ्यावा लागणार. शेवटचे वर्ष `निवडणूक वर्ष’ मानले जाते आणि तेव्हाचा अर्थसंकल्पसुद्धा केवळ लेखानुदानापुरताच असतो. याचाच अर्थ सरकारला आता अर्थपूर्ण कामासाठी केवळ दोनच वर्षे राहिली. अशा वेळी बरेच काही करण्याची वृथा स्वप्ने बाळगण्यापेक्षा अर्धा डझन कामेच हाती घेऊन ती जर पूर्णत्वास नेली, तर जनतेच्या मनात आत्मविश्वास निर्माण होऊ शकेल. २०२४ च्या निवडणुकीत तोच उपयोगात येईल.

स्विस बँकेतून किती काळा पैसा परत आणला वा पाकिस्तानला कसे नामोहरम केले, यापेक्षा घरातल्या कर्त्या तरुणाचा रोजगाराचा प्रश्न मिटला, गावे स्वयंपूर्ण होऊ लागली व शिक्षणावरचा व आरोग्यावरचा सामान्याना न परवडणारा खर्चाचा सुसह्य झाला, तर जनतेसाठी तेच `अच्छे दिन’ असतील.

अलिकडेच झालेल्या जनमत चाचणीत मोदींची लोकप्रियता २०१४ पेक्षा वाढल्याचे दिसले. ही विरोधकांना बसलेली सणसणीत चपराक आहे. नोटाबंदी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विषयांचे विरोधक भांडवल करत असतानाही भारतीय जनतेने मोदींवरच विश्वास दाखवला आहे.

मोदींच्या दुसऱ्या टर्ममध्ये शेती कायद्यावरून पंजाब, हरयाणातील शेतकऱ्यांचे आंदोलन पेटले; त्याची आंतरराष्ट्रीय बातमी बनली व ती चार महिने चालली. आता तर कोरोनाच्या महामारीने जगाबरोबर भारतालाही ग्रासले आहे. दरम्यान गेल्या महिन्यात बंगालात झालेल्या पराभवाने मोदी सरकारच्या मर्यादाही स्पष्ट झाल्या. यातून बाहेर येणे हे मोदींसमोरचे मोठे आव्हान आहे.
मोदी सरकारचे पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !

(भारतकुमार राऊत हे वरीष्ठ पत्रकार-संपादक-लेखक असून शिवसेना खासदारही राहिले आहेत. हा लेख साभार त्यांच्या फेसबुक पोस्टवर घेतला आहे.)

हेही वाचा : इन्फोसिसची नोकरी सोडली आणि पाणीपुरी विकून कमाल केली

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!